Monday, February 1, 2010

हाय.. व्हॉट्स अप? कूल ना.. तुम्ही सवाईला होता का? ओ.. सवाई एकांकिका स्पर्धा , आम्हा नाटय़वेडय़ांसाठी ऑस्करच जणू. हे माझ सवाई अटेंड करण्यचं चौथं वर्ष. पहिल्या वर्षी नाटय़मंडळाच्या मित्रांबरोबर सहज नाईटआउटकरायचा म्हणून आलो, पण त्यावेळी सादर झालेल्या एकांकिका आणि एकूणच त्या वातावरणात असलेला उत्साह यामुळे सवाई एकांकिका स्पर्धा म्हणजे माझा श्वासच बनली. मी ही या नाटय़दुनियेमध्ये जरा अपघातानेच शिरलो.

शाळेमध्ये नाटकांशी थोडाफार संबंध आला असला तरी मी नाटकवेडा वगैरे नव्हतो. हा किडा शिरला तो अर्थातच कॉलेजमध्ये आल्यावरच. कॉलेज सुरू होऊन चार ते पाच महिनेच झाले होते, कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज असाच माझा प्रवास असायचा त्यापलिकडे मला कॉलेजचे कॅन्टिन देखील माहित नव्हते. माझा मित्र सिद्धेश याने मला नाटकाच्या ऑडिशन्सबद्दल सांगितले. आम्ही आमच्या कॉलनीमध्ये एकत्र नाटकं बसवली होती. त्या दिवशी संस्कृतचं लेक्चर बंक करून ऑडिशनला पोहोचलो. बरेच जण आले होते, त्यातले काही माझ्यासारखे नवे होते तर काही जूने. त्या हॉलमध्ये गेल्यावर मला कळलं की आपल्याला पाच मिनिटांत अ‍ॅक्ट करून दाखवायचे आहे आणि माझ्याकडे तर काहीच तयार नव्हते, सॉल्लिड घाबरलो होतो, मला तर बसल्या जागीच घाम फुटत होता. माझं नाव दोनदा घेतलं गेलं तरी मला कळलं नाही शेवटी सिद्धेशने मला जबरदस्तीने स्टेजवर पाठवलं. आमचे दिग्दर्शक सुनील सर, ते चेहऱ्यावरूनच इतके खडूस आणि फिल्मी दिसत होते त्यांना पाहून तर माझं उरलं सुरलं बळही गेलं. पण माझी अवस्था बहुतेक त्यांना कळली असावी आणि त्यांनी मला टेन्शन न घेता परफॉर्म करायला सांगितले. खरंच त्यांच्या तोंडून येणारा जाम भारीहा शब्द आणि चिडल्यावर तोंडीतून येणाऱ्य ओव्या आजही आठवतात कारण त्या ऑडिशनपासून नाटय़क्षेत्रात माझा झालेला प्रवास.. म्हणजे माझा प्रत्येक श्वासच होता.. तो न विसरता येणाऱ्या आठवणींचा एक नाटय़प्रयोग होता.. हाऊसफुल्ल!

हे गाईज, हाय..!! कसा गेला लास्ट वीक? माझ्यासाठी तर फारच बिझी होता. कारण होत प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी. शेवटच्या वर्षात असलो तरी प्रजासत्ताक दिनाकरीता मी अभ्यास आठवडाभर बाजूलाच ठेवून दिला. नाटय़मंडळाच्या मित्रांना एकत्र घेऊन मी प्रजासत्ताक दिनासाठी एक स्किट करतोय.मी या स्किटमध्ये तरूणांना देशभक्तीचे, आत्मीयतेचे महत्व पटवून देणाऱ्या वृध्द स्वातंत्र्यसेनानीची भुमिका करतोय. मला यावेळी आठवण होतेय ती माझ्या कॉलेजातल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाची, स्वातंत्र्य दिनाच्या वेळी माझा शाळेत सत्कार होता त्यामुळे मी कॉलेजात नव्हतो म्हणून माझी उस्सुकता अधिक वाढली होती. शाळेत असताना मी कार्यक्रमांच्या आयोजनात पटाईत होतो, १५ ऑगस्ट असो वा २६ जानेवारी बाई कार्यक्रमांची पूर्वतयारी करता मलाच बोलवायच्या. हो आणि नववी आणि दहावीत असताना एम.सी.सीत होतो त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडही करायला मिळाली फार आनंद व्हायचा, कॉलेजातही एन.सी.सी जॉईन करायचं होत पण एन.सी.सी ऑफीस सापडेपर्यत एन.सी.सीची प्रवेश प्रक्रीया बंद झाली होती. प्रजासत्ताक दिनाबाबतचा माझा कॉलेजचा पहिला अनुभव अतिशय वाईट आहे. प्रजासत्ताक दिनाची माहिती घेण्याकरीता म्हणून मी आदल्या दिवशी अमोलला फोन केला. अरे उद्या किती वाजता कॉलेजला भेटायच’, अमोल म्हणाला काय? अरे वेडा आहेस का तू..अरे आज रात्री आपण पिकनीकला जातोय तू येणारेस का?’ ‘अरे, पण प्रजासत्ताक दिनासाठी कॉलेजला जायला हवं आपण..’ ‘मित्रा आता आपण कॉलेजात आहोत शाळेत नाही..अमोलला पिकनिकला येत नाही सांगून एकटंच कॉलेजला जायच ठरवलं. पांढऱ्या रंगाचा झब्बा घातला होता अगदी पक्का देशभक्त बनलो होतो कारण अशी संधी पहिल्यादाच मिळाली होती, यापूर्वी फक्त शाळेचा युनिफार्म घालावा लागायचा. कॉलेजचे मैदान म्हणवल्या जाणाऱ्या त्या छोटय़ाश्या भागात आलो आणि डोळ्यासमोरच दृश्य पाहून थक्कच झालो, समोर जे काही चालले होते ते माझ्यासारख्याला न पटणारे होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यायला जेमतेम तीस-पस्तीसच मुले होती आणि तीही एन.एस.एसमधली. त्यांना येण भागच होत म्हणून. शिक्षकही बहुधा सक्तीनेच आले असावेत, यावेळी मला आमच्या शाळेतल्या केळसे बाईंची फार आठवण झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या लहान मुलांना आर्वजून शाळेत आणायच्या. तसे वातावरण कॉलेजमध्ये अजिबात जाणवले नाही. बऱ्याच वेळा नंतर प्रश्नचार्य आले त्यांचे भाषण झाले, सगळ्यांनी ध्वजवंदना दिली, एक छोटेखानी कार्यक्रमही झाला, पण हे सुरू असताना माझ्या मनात वेगळेच विचार घोळत होते. सरकारची सक्ती आहे म्हणूनच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन कॉलेजात होत असावेत, त्यामागची देशभक्तीची भावना हरवली तर नसेल? कदाचित यामुळेच तरूण पिढीला देशाविषयीच्या आत्मियतेचा अर्थ माहित नसावा, राजमुद्रा, राज्यघटना याविषयी माहिती नसावी. काहींची तर आपले राष्ट्रीय गीत नक्की कोणते इथूनच सुरूवात होते, मग ते पाठ असण्याचा विचार करणेच चूकीचे होईल. आपण कॉलेज डेजना गर्दी करतो मग ध्वजाला मानवंदना द्यायला का उपस्थित राहत नाही. कॉलेजने या दिवसांना विद्यार्थ्यांना उपस्थित रहाणे सक्तीचे करणे ही गोष्टच लज्जास्पद आहे. आपण देशाविषयी आत्मियता वाढावी म्हणून टि-शर्ट आणि कॅपवर राष्ट्रध्वज छापावा अशी मागणी करतो. पण हे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखे आहे. शाळेतील भारत माझा देश आहेही प्रतिज्ञा आपण नीट आठवली तर कोणालाच कोणत्याही प्रकारच्या सक्तीची गरज भासणार नाही. आय होप.. तुम्हीदेखील तुमच्या कॉलेजात, शाळेत, कॉलीनीत ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रजासत्ताक भारताला अभिवादन केल असेल, करणार असाल.. जय हिन्द!!!

हाय फ्रेन्डस!!! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

तिळ गुळ घ्या गोड-गोड बोला..

तुम्ही यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता का? मी सहभागी झालो होतो, सर्वात मजा आली सी-लिंकवरून धावताना, मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यामागे तेच एकमेव कारण होतं. हाफ मॅरेथॉनमध्ये मी धावलो, २१ कि.मीचा पल्ला.. जिंकलो नाही तरी चालेल पण २१ कि.मी. पल्ला गाठायचा एवढंच डोक्यात होतं. शिवाय मॅरेथॉनमध्ये कॉलेजातले फार जवळचे मित्रही सोबत होतेच. सॉलीड अनुभव होता.

अजय, तेजस, सोनल, आदिती आणि आकाश आमचा कॉलेजचा ग्रुप, कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आतापर्यत आम्ही एकत्र आहोत. मैत्रीत जशी भांडणे, हेवे-दावे, रूसवे-फुगवे असतात तसे आमच्यातही झाले. कुणास ठाऊक काय जादू आहे.. पण मैत्रीचा त्या सूक्ष्म धाग्याने आजतागायत आम्हाला एकत्र बांधून ठेवले आहे आणि यापुढेही ठेवो.. तो दिवस आठवला की आजही हसू आवरत नाही, ज्यावेळी मी सोनल आणि आदितीला पहिल्यांदा भेटलो.. कारण शाळेत असताना मैत्रीण हा विषय माझ्या काही फारसा जवळचा नव्हता, शाळेत बाई शिक्षा म्हणून मुलींमध्ये बसवायच्या. मुलींशी बोलायचं म्हणजे सॉलीड गोची, काय बोलायचं? कसं बोलायचं? असे अनेक प्रश्न पडायचे. कॉलेजमध्ये आकाशनेच सोनल आणि आदिती यांच्याशी ओळख करून दिली, मी फक्त हाय.. केलं (ते पण जरा दबक्या स्वरात), त्यानंतरचा दीड तास मी काही न बोलता त्यांच्याबरोबर बसलो होतो. मुलींच्या गराडय़ात असणं म्हणजे जास्त पॉप्युलर असणं, हे आकाशने मला सांगितलं तसंच कॉलेज लाईफस्टाईलमधल्या अनेक नव्या गोष्टीची ओळख त्याने करून दिली. शाळेतील समीकरणं कॉलेजात आल्यावर बदलल्याची जाणीव झाली..